थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !
चारची खरी बाजू 'चार' दिशेत आहे !
'चार' खांबांशिवाय घर बांधता येत नाही, 'चार' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
'चार' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर 'चार' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत,
'चार' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली 'चार' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू 'चार' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात,
चारचा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
चारच्या 'वर्गा'स पुन्हा 'चार'ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसस्ष्ट घरांचे 'बळ' मिळते !
यांची टीका ही 'चौफेर' असते, यांचे फटके म्हणजे 'चौकार' असतात !
चारचे सामर्थ्य देवीच्या 'चार' भुजांसारखे असते अन पावित्र्य गाईच्या 'चार' पावलांसारखे असते.
आपण ज्या गाईचे दुध पिऊन लहानाचे मोठे होतो तिला स्तनाग्रेही 'चार' असतात अन पायही 'चार'च असतात,
ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी 'चार' परस खोल असावीच लागते,
'चार' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत, 'चार' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
जगातल्या 'चौघां'चेही असेच असते, यांनी 'चार' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही,
अन 'चार' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत,
ज्या घरात आपण राहतो तेदेखील 'चौसोपी' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
चौसोपी घराबाहेर 'चारचाकी' असली की शान अधिक वाढते !
'चार'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.
'चार' लोकांपासून 'चार' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
युगे देखील तीन झाली आहेत कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून 'चौघां'ची महिमा जाणावी.
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना 'सारेगम' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील 'चार'च आहेत - दोन हात अन दोन पाय !
वर्ण देखील चार होते, लीप वर्ष देखील 'चार' वर्षाला येते !
जमीन सुद्धा 'चौरस'च शुभ समजली जाते,
माणूस हुशार झाला की त्याला 'चौकस' बुद्धीचा समजलं जातं ...
गर्भसुद्धा 'चार' महिन्यांचा झाल्याशिवाय त्याला ऐकायला येत नाही अन त्याच्या मज्जारज्जुंचे खरे काम सुरु होत नाही !
चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो,
चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !
'चार' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो,
'चार' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते, '
चार' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात,
'चार' घास खाल्ले की पोट भरल्या सारखे वाटते, '
चार' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते,
'चार' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो,
'चार' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही,
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर 'चौ'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!
'चार' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते,
'चार' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.
इतकेच कशाला चितेवर 'चार' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही, 'चौघां'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही,
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा 'चार' फुट खोल खांदावेच लागते त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे 'चार' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमगणार नाही !!
No comments:
Post a Comment